थिरूवनंतपुरम, दि. 10 – कोविड महामारीमुळे कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यानुसार केरळ सरकारने आपल्या राज्यातील 568 कैद्यांची कारागृहातून पॅरोलवर सुटका केली आहे.
अन्य 932 कैद्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात कारागृहातून सोडले जाणार असून रिमांडवरील 350 कैद्यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एका उच्चस्तरीय समितीनी कारागृहांमध्ये कैद्यांच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या गर्दीमुळे तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्त करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली होती.
कोविडच्या पहिल्या लाटेत त्यानुसार देशाच्या विविध भागातील कैद्यांची सुटका करण्यात आली होती. तीच सवलत याही लाटेत देण्यात यावी असा आदेश सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. ज्या आरोपींना नियमितपणे शिक्षा झाली आहे अशा आरोपींना 90 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात यावा, असेही सुप्रीम कोर्टाने सुचवले आहे.