सातारा – दलित महिला विकास मंडळाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या कायदेविषयक मोफत सल्ला केंद्राने 53 जोडप्यांचा संसार वाचवला आहे. बालकांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या आई बाबांना भानावर आणण्याचा प्रयत्न केंद्राने केला आहे.
गेल्या वर्षभरात केंद्राकडे 282 तक्रारी केंद्राकडे दाखल झाल्या होत्या. दलित महिला विकास मंडळाच्या सचिव ऍड. वर्षा देशपांडे यांनी ही माहिती दिली.
कौटुंबिक हिंसाचार व महिलांचे सरंक्षण कायद्यांतर्गत 14 प्रकरणे दाखल झाली. कौटुंबिक विवाह विषयक 167 तक्रारी आल्या. 53 प्रकरणांमध्ये तडजोडीने समेट घडवण्यात आला. 6 प्रकरणांमध्ये सामोपचाराने घटस्फोट देण्यात आला. 215 प्रकरणांमध्ये 41 तक्रारीत यशस्वी समझौता झाला.
72 प्रकरणात संबंधितांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. 147 महिलांची त्यांच्या पतीच्या शेतजमिनीवर सह हिस्सेदार म्हणून नावे लावून त्यांचा हिस्सा मिळवून देण्यात आला. पती व मुलांना सासरी सोडून माहेरी निघून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण ऍड. शैलजा जाधव यांनी नोंदवले.
घटस्फोट घे आणि मोकळा हो असा सल्ला दिला जातो. मात्र मुक्तांगणचे व्यासपीठ त्याला अपवाद आहे. 2016 मध्ये 38, 2017 मध्ये 48, 2018 मध्ये 98, तर 2019 मध्ये 53 कुटुंबाचे यशस्वी समुपदेशन करण्यात आले. दलित महिला विकास मंडळाच्या सचिव ऍड. वर्षा देशपांडे यांच्या मार्फत गुरूवार पेठ मुक्तांगण येथे कायदेशीर सल्ला केंद्र चालवले जाते. महाराष्ट्र विधी व सेवा प्राधिकरणाशी हे केंद्र संलग्न आहे. दर सोमवारी या केंद्राचे कामकाज चालते. ऍड. विजय खामकर, माया पवार, स्वाती बल्लाळ, दिलीप भाटिया, रूपाली मुळे, दीपेन्ती चिकणे यांचे केंद्राला सहकार्य लाभते.