पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील 526 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 106 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत 16 फेब्रुवारी रोजी एकाच वेळी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली. याचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. एकूण 9 लाख 72 हजार 104 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 9 लाख 32 हजार 851 विद्यार्थी उपस्थित होते. 1 लाख 94 हजार 388 विद्यार्थी पात्र ठरले. यात पाचवीचे 1 लाख 36 हजार 821, तर आठवीचे 57 हजार 567 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शहरी व ग्रामीण अशी गुणवत्ता यादीही जाहीर झाली. पाचवीचे एकूण 265 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यातही शहरी भागातील 110 व ग्रामीण भागातील 105 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीएसई व आयसीएसईच्या शाळेतील 50 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 58 विद्यार्थी आहेत.
आठवीच्या परीक्षेतील 261 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यात शहरी भागातील 100, ग्रामीण भागातील 110, सीबीएससी व आयसीएसईचे 51 विद्यार्थी आहेत. पुण्यातील सर्वाधिक 48 विद्यार्थी या यादीत समाविष्ट आहेत.
गुणवत्ता यादीतील जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या
पुणे – 106, कोल्हापूर – 96, सातारा – 77, सोलापूर- 46, अहमदनगर-30, सांगली-27, बीड-24, नांदेड- 21, रत्नागिरी-16, लातूर-11, उस्मानाबाद-8, जळगाव – 8, परभणी-8, नाशिक-7, धुळे-7, औरंगाबाद- 6, ठाणे-6, अकोला – 5, सिंधुदुर्ग – 3, चंद्रपूर-3, जालना-2, मुंबई – 4, रायगड – 1, बुलढाणा-1, यवतमाळ – 1 , अमरावती-1, नागपूर – 1.