मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती (दि. ३ ) महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-
■ व्हॉट्सॲप- १९७ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – २१५ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.
■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ अकोला जिल्ह्यातील जुनाशहर पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३ वर
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर केली होती व त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
चुकीच्या माहितीपासून सावधान
सध्याच्या काळात फेसबुक, व्हाट्सअप इत्यादी सोशल मीडियावर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, अनेकजण वेगळे उपचार आपल्या भारतीय इतिहासात सांगितले आहेत असे म्हणत, चुकीची माहिती असणारे मेसेज व पोस्ट्स फॉरवर्ड किंवा शेअर करत आहेत.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कृपया कोणीही अशा मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवून स्वतःवर किंवा आपल्या घरातील इतरांवर कोणतेही प्रयोग करू नका. तसेच अशा मेसेजमधील माहितीची खातरजमा तज्ज्ञ डॉकटरांकडून करून घ्या. असे मेसेज फॉरवर्ड करू नये, कारण खोटी माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.