रत्नागिरीतील आंबा उत्पादकांना ‘आत्मा’ची मदत
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, पण त्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दि. 1 ते 10 एप्रिल या कालावधीत तब्बल पाच हजार हापूस आंब्याच्या पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून राज्याच्या अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये रवाना झाला आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही साखळी योजना तयार करण्यात आली आहे. प्रति डझन जवळपास 350 रुपये असा दर सध्या हापूसला मिळाला आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाला असून, यामध्ये देशात आंब्याचा हंगाम सुरू होतो. दरवर्षी एप्रिलपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त विक्रेत्यांकडे आंबा पोहोचलेला असतो; परंतु यावर्षी करोनामुळे अजूनदेखील आंबा हा उत्पादकांच्या घरीच पडून होता. “आत्मा’ अर्थात ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सीने केलेल्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली आहे. राज्यात पुणे, पंढरपूर, फलटण, सातारा, कराड, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील बाजारांत या पेट्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान, आंबे घेतल्यानंतर पैसेदेखील थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमधून या पेट्या रवाना झाल्या. मोठ्या बागायतदारांचे स्वत:चे नेटवर्क असताना छोटे आंबा बागायतदार आणि शेतकरी यांना मात्र अनेक अडचणी येत होत्या. पण, त्यांच्या मदतीला “आत्मा’ विभाग धावून आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांचे आवाहन
दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 8806806308 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.