प्रवास करणाऱ्या रेल्वे गाडीला झाला प्रदीर्घ उशिर
बंगळुरू – रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्ती कामांमुळे रविवारी हॅम्पी एक्स्प्रेसला उशीर झाला. ट्रेनला उशीर झाल्याचा फटका नीटच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याने या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सुमारे 500 विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा चुकली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासह रेल्वेनेही या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
बेल्लारी येथून बंगळुरूच्या दिशेने जाणारी हम्पी एक्सप्रेसउशिराने धावत होती. ही ट्रेन दुपारी अडीच वाजता बंगळुरू स्थानकात पोहोचली. नीटच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात हजर राहण्याची वेळ दुपारी दीडपर्यंतच होती. शेकडो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला ट्विट करून या घटनेची माहिती दिली. सुहास नावाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या परीक्षा केंद्रात अचानक बदल करण्यात आला. मी परीक्षा केंद्रात वेळेत पोहोचणार की नाही हे सांगता येत नाही.
दक्षिण-पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ई. विजय यांनी दिलेल्या माहितीनुसार हम्पी एक्स्प्रेसला उशीर होत असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली होती. आरक्षण केलेल्या सर्व प्रवाशांना एसएमएसद्वारे ही माहिती दिली होती. ट्रॅक दुरुस्तीसाठी हम्पी एक्स्प्रेसच्या मार्गात बेल्लारी ते यशवंतपूर दरम्यान बदल करण्यात आला. या कारणामुळे ट्रेनला उशीर झाला. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या नीटच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यासाठी रेल्वेच्या वतीने केंद्र सरकारला पत्र पाठवण्यात
येणार आहे.