कोलकाता : शिवरात्रीचा प्रसाद घेतल्यानंतर प. बंगालमधील माल्डा जिल्ह्यात मंगळवारी किमान 500 जणांना विषबाधा झाली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कालियाचाक येथील वैद्यकीय अधिकारी कौशिक मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगीतोला ग्रामीण रुग्णालयात उलट्या आणि पोटदुखी सुरू झाल्याने 70 जणांना दाखल करण्यात आले. सिबुतोला, श्रीपूर, तीनघोरीया आणि जोगोलतोला येथील बहुतांश ग्रामस्थांचा त्यात समावेश आहे. त्यातील दहा जणांना अद्याप रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तर दोन जणांना माल्डा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हालवण्यात आले आहे. अन्य रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सिबुतोला येथील महाशिवरात्रीला त्यानी हा प्रसाद खाल्ला होता.
रविवारी शेकडो लोक आजारी पडल्याचे समजताच मोटाबारीच्या आमदार सबिना यास्मिन, गटविकास अीधकारी संजय घिशींग आणि मिस्त्री यांनी या गावांत धाव घेतली. विशेष वैद्यकीय पथक उभारले. दोन वैद्यकीय शिबिरे घेऊन बाधीतांवर उपचार करण्यात आले. हे शिबिर संपल्यानंतर घरोघरी जाऊन पाहणी करण्यात येणार आहे, असे मिस्त्री यांनी सांगितले.
कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर भोजन घेतल्यानंतर हे ग्रामस्थ आजारी पडले असे आमदार यास्मिन म्हणाल्या. विषबाधा झालेल्या गावात पाच रुग्ण वाहिका पाठवण्यात आल्या असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुपनलिकांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.