पुणे – सेंट्रो कारने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराच्या कुटुंबियांना 50 लाख 45 हजार 872 रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी दिला आहे. त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून वार्षिक 8 टक्के दराने व्याज देण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. माधव (नाव बदलले आहे) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा खेड तालुक्यातील आहे. तो 26 जून 2016 रोजी पुणे नाशिक रस्त्याने पुण्याकडून दुचाकीवर चालला होता. त्यावेळी खेड तालुक्यातील पेठ गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
तो खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याला दरमहा 23 हजार 237 रुपये पगार होता. या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्याची 25 वर्षीय पत्नी, साडेतीन आणि एक वर्षाचा मुलगा आणि आईने ऍड. जी.पी.शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे 26 जुलै 2016 रोजी रॉयल सुंदरम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.
उत्पन्न सिध्द करण्यासाठी तो काम करत असलेल्या कंपनीतील एचआरची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर निकाल दिला. याविषयी ऍड. जी.पी. शिंदे म्हणाले, मयताचे वय, भविष्यात त्याचा निश्चित पगार वाढला जाणार, त्याच्यावर अलंबूत्व असलेले चौघे, या बाबींचा विचार करत न्यायालयाने ही रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. त्यातील काही रक्कम मुले सज्ञान होईपर्यंत मुदत ठेव स्वरूपात बॅंकेत ठेवावी लागते.