मुंबई – शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पावसाळी अधिवेशनाकडे लागले आहे. शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात नवीन सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री विधिमंडळात जाण्यासाठी येताच पायऱ्यांवर उभ्या असलेल्या विरोधकांनी सरकरविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ” ५० खोके एकदम ओके. आले रे आले गद्दार आले” अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार एकसाथ थांबून घोषणा देत असल्याचे दिसून आले. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यसह इतर आमदार त्यासोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदार घोषणा देताना दिसून आले.
ऐतिहासिक क्षण
विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले.