नवी दिल्ली – सरकारी समितीच्या एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील तब्बल 50 टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते.
समितीचे सदस्य मानिंद्र अग्रवाल यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फेब्रुवारी 2021 नंतर रूग्णवाढीचे प्रमाण कमी होणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार सोमवार (19 ऑक्टोबर) पर्यंत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 75 लाखांचा टप्पा पूर्ण केला. सध्या जगात
सर्वात जास्त कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. मात्र, भारत आता अमेरिकेच्या जवळ पोहोचला आहे.
आतापर्यंत 30 टक्के भारतीय कोरोना बाधित –
मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी समितीने केलेल्या अभ्यासात आतापर्यंत 30 टक्के भारतीयांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार येत्या फेब्रुवारी पर्यंत देशातील 50 टक्के भारतीय कोरोना बाधित होऊ शकतात, असे मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले.
विषाणु वैज्ञानिकांची समिती –
देशात कोरोना महासाथीविरूद्धच्या युद्धादरम्यान महासाथीचा योग्य अंदाज बाधण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी केद्र सरकारने विषाणु वैज्ञानिकांची (virologists) 10 सदस्यांची समिती स्थापन केली.
या समितीला progression of the covid – 19 pandemic in india : prognosis and lockdown impacts असे नाव देण्यात आले आहे. या समितीने आतापर्यंत कोरोना विषाणूसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा तपास केला आहे.