* जुन्या सर्व्हेच्या मागणीनुसारअद्यापही सर्वेक्षण नाही
* 2021 पासून काम बंदच
* मुख्यमंत्र्यांचे “त्या’बाबत भाष्य नाही
समीर भुजबळ
वाल्हे – महाविकस आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सासवड येथील सभेत पुरंदर तालुक्यातील गुंजवणी बंदिस्त पाइपलाइनच्या योजनेसाठी 50 कोटी देण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला. यामुळे येथील शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रत्यक्षात गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त पाइपलाइनचे काम आद्यप शेतकरीवर्गाच्या जुन्या सर्व्हेनुसार काम सुरू व्हावे या मागणीवरून ऑक्टोबर 2021 पासून बंद ठेवण्यात आले आहे.
अधिकारीवर्ग मात्र, शेतकरीवर्गाच्या मुख्य मागणीनुसार अद्यापपर्यंत प्रत्यक्षात सर्वेक्षण करण्यात आले नसल्याने शेतकरीवर्गामधून संताप व्यक्त होत आहे. गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त पाइपलाइनचे मुळच्या 1993 च्या मंजूर प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार, वाल्हे, परिंचे, हरणी, दौंडज, राख या गावांच्या उत्तरेकडील चढाच्या भागातून व्हावे. व बंदिस्त पाइपलाइनमुळे बचत झालेल्या पाण्याचा उपयोग मुळच्या 15 गावातील लागवड योग्य क्षेत्र ओलीताखाली आल्याशिवाय इतर गावांना पाणी देण्यास विरोध केला होता.
तसेच वरील सर्व बाबी मान्य होत नाहीत, तोपर्यंत पुरंदरमधील वाल्हे, परिंचे, माहूर, मांढर, दौंडज, हरणी, राख या गावात बंदिस्त पाइपलाइनचे काम चालू द्यायचेच नाही असे शेतकऱ्यांनी ठरवले होते. व पूर्वी 1993 मध्ये झालेल्या सर्व्हे नुसार पाणी यावे व आरक्षित 12 हजार एकर क्षेत्र ओलीता खाली आले पहिजेल, अशी ठामपणाची मागणी शेतकऱ्यांची होती. तसे झाले नाहीतर काम सुरू करू देणार नाही. असा इशाराही दिला होता. यामुळे ऑक्टोबर 2021 पासून पुरंदर तालुक्यात सुरू असलेले बंदिस्त पाइपलाइनचे काम बंद ठेवण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनुसार 31 जानेवारी 2022 रोजी गुंजवणी पाणी प्रश्नावर पुण्यातील सिंचन भवन येथे पुरंदर तालुक्याचे शिष्टमंडळ व मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी 1993 च्या मूळ प्रवाही कालव्याच्या सर्वेक्षणानुसार मुख्य बंदिस्त पाइपलाइन टाकण्यास हनुमंत गुणाले यांनी तत्वतः मान्यता दिली होती. तसेच, मूळच्या लाभ क्षेत्रातील संपूर्ण लागवड योग्य क्षेत्राला पाणी देण्याची हमी व सुधारित प्रस्तावात शेतकऱ्यांनी हेक्टरी दीड लाख रुपये खर्चून स्व:खर्चाने ठिंबक सिंचन संच बसविणे सद्य:स्थितीत शेतकऱ्यांना परवडणारे नसल्यामुळे सध्या ठिंबक सिंचन न करता सध्या मुख्य बंदिस्त पाइपलाइन वरील गावांच्या पश्चिम-उत्तर दिशेने पूर्ण करून त्या-त्या गावच्या ओढ्या-नाल्यावरील बंधारे भरून घेण्याची व्यवस्था करणे या तीनही गोष्टींना गुणाले यांनी तत्वतः मान्यता दिली होती.
गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त पाइपलाइनचे पाणी येथील शेतकरीवर्गाला देताना 1993 च्या सर्वेक्षणानुसार आम्ही सर्व गावांना पाणी देणार आहे की नाही? ही भूमिका प्रथम स्पष्ट करावी.
– बाबासाहेब राऊत, शेतकरी नेते
आश्वासन हवेतच विरले?
पुणे सिंचन भवनातील मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी गुंजवणी प्रकल्पाच्या 1993च्या मागणीनुसार काम करण्यास तत्वत: मान्यता जानेवारी 2022 मध्ये दिली होती; त्यानंतर आत्तापर्यंतच्या आठ महिन्यांत या कामाची कोणतीही कार्यवाही प्रत्यक्षात जागेवरती येऊन सर्वेक्षण झाले नसल्याने गुंजवणीच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामास जुन्या सर्व्हेनुसार तत्वतः मान्यता दिलेल्याचे आश्वासन हवेतच विरले का, असा सवाल उपस्थित होत आहे.