पुणे : देशात 50 टक्के नागरिक मास्कच वापरत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाहणीत आढळून आले आहे. एवढेच नव्हे, तर केवळ 7 टक्के लोकच सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करतात, असादेखील निष्कर्ष पाहणीतून काढण्यात आला आहे.
मास्क न वापरणे, सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे या गोष्टी सर्रास दिसून येत आहे, स्थानिक प्रशासन, पोलीस यांच्याकडून कारवाईही केली जात आहे. तसेच दंडही वसूल केला जात आहे. असे असतानाही देशातील एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोक या नियमांचे पालन तर करत नाहीतच परंतु मास्क ही परिधान करत नसल्याचा निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला
आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये ही गोष्ट मान्यही केली आहे. देशातील 25 प्रमुख शहरांमध्ये ही पाहणी करण्यात आली आहे. उर्वरित 50 टक्क्यांमध्येही केवळ सातच टक्के लोक या नियमांचे तंतोतंत पालन करताना दिसत असल्याचाही निष्कर्ष या पाहणीतून आढळला आहे. देशभरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. असे असताना सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. सध्या सकारात्मक बाब म्हणजे बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाली आहे.
पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होतोय
महाराष्ट्रात गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णसंख्या आणि रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी होतो आहे. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर 25.2 टक्क्यांवरून 14.1 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये नमूद केले आहे.
पुणे, ठाणे, सातारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या राज्यात सर्वाधिक होती. मात्र आता गेल्या तीन आठवड्यांपासून, येथील रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दर कमी होताना दिसत असल्याचे निरीक्षण केंद्राने नोंदवले आहे.