पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून पाच लाख पुणेकरांना दिलासा देऊ शकणाऱ्या फनटाइम ते पु. ल. देशपांडे उद्यान कालव्यावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथे चार ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागीच पथदिवे आहेत. ते हटवल्याशिवाय रस्ता सुरू करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हे खांब काढण्यावरून गेल्या दीड वर्षापासून पथ आणि विद्युत विभागांत नुसतेच पत्रव्यवहार सुरू आहेत. त्यामुळे हे खांब आधीच काढले गेले असते, तर हा रस्ता आतापर्यंत वापरात आला असता. दरम्यान, या रस्त्याची पथ विभागाने पाहणी केली असून खांब काढल्यास रस्ता सुरू करणे शक्य असल्याचेही सांगण्यात येत आहे.
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. आधीच या रस्त्याची चाळण झालेली असून आता पावसामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्यावर एक किलोमीटर अंतर ओलांडण्यासाठी तब्बल दीड-दोन तास घालवावा लागत आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे उद्यानामागून थेट फनटाइम थिएटरपर्यंत कालव्याकडेने केलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली जात होती. या रस्त्यासाठी केवळ 300 मीटरची जागा ताब्यात नसल्याने हे काम रखडले होते. अखेर रस्त्याची गरज लक्षात घेऊन पालिकेने भूसंपादन हाती घेतले होते. ही जागा ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने हे काम पूर्ण करत जनता वसाहतीपासून मुख्य सिंहगड रस्त्यापर्यंत काम पूर्ण केले आहे.
दरम्यान, रस्ता सुरू करण्यात वीज पुरवठ्याचे चार खांब गेल्या दीड वर्षापासून पालिकेच्या विद्युत विभागाने काढलेले नसल्याचे समोर आले आहे. हे खांब या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर असून, त्यामुळे या रस्तांची एक लेन प्रभावित होत आहे. परिणामी, रस्ता सुरू केल्यास खांबांच्या ठिकाणी एकच लेन वाहतुकीस उपलब्ध झाल्याने या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे या अवघ्या दहा फूट बाय दहा फूट जागा अडवून असलेल्या चार खांबांमुळे उपयुक्त ठरणारा पर्यायी रस्ता काम पूर्ण झाल्यानंतरही बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावर चार ठिकाणी विद्युत खांब असून ते काढण्याबाबत दीड वर्षांपासून विद्युत विभागाशी चर्चा सुरू आहे. मात्र, खांब अद्याप काढलेले नसल्याने रस्त्याचे काम काही भागात अडून पडले असून, रस्ता सुरू करणे शक्य नाही.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभागप्रमुख, मनपा
या खांबांची पाहणी करण्यात आली आहे. हे महावितरणचे खांब असून ते उच्च दाबाचे आहेत. त्याबाबत महावितरणशी चर्चा करण्यात आली असून पुढील दहा ते 15 दिवसांत हे खांब काढले जातील. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
– श्रीनिवास कंदूल,मुख्य अभियंता, विद्युत विभाग, मनपा