मुंबई – परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. काल 29 तारखेपर्यंत 41 हजार 874 बस फेऱ्यांच्या माध्यमातून 5 लाख 8 हजार 803 स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या तर रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना थांबवून तसेच ट्रक किंवा अन्य माध्यमातून जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था उपलब्ध करणे, त्यांना नियोजनबद्धरित्या बसमध्ये बसवून देण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अवैधरित्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांवर आरटीओ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे.
स्थलांतरितांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पुढे आल्या आणि आता या बसेसमधून इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे. आतापर्यंत लाल परीने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.
यातील काही स्थलांतरित मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचाही लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचेही काम केले जात आहे.
3 हजार नागरिक परतले
वंदे भारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात 26 फ्लाईट्सच्या माध्यमातून 3 हजार 459 नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. उर्वरित राज्यातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे. दि. 7 जून 2020 पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलॅंड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी परतले आहेत.