मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून सध्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील लस आणि लसीकरणाच्या तुटवड्यावरून राज्य – केंद्र सरकार यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या मुद्यांवर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य केले आहे
प्रकाश जावडेकर म्हणाले,’राज्य सरकारने लसीकरणाचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही. राज्य सरकारने महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले. राज्य सरकारला नियोजन करावे लागेल. राज्य सरकारनं आपले काम नीट करून नसून आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर टाकत आहे. माझ्या माहितीनुसार राज्यात सध्या 5 ते 6 दिवसांची लस शिल्लक असल्याच्या दावा त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, शिवसेनेने भाजपाच्या, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले आणि नंतर गद्दारी करत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.
दरम्यान, लसतुटवड्यामुळे नवी मुंबईतील पनवेलसोबतच सांगली, साताऱ्यातही लसीकरण ठप्प झाले आहे. लसीतुटवड्यावर मात्र काही दिवसांपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं होत. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.