बीड – भरधाव ट्रकने अॅपे रिक्षाला धडक देऊन पळ काढला. आठ किमी अंतरावर जाऊन ट्रक एका तलावाजवळ उलटला. या अपघातात अॅपेतील पाच जण ठार झाले असून सात ते आठ जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान पांगर बावडी परिसरात हा भीषण अपघात झाला.
बीड शहराजवळील तेलगाव रोडवरील पांगर बावडी परिसरात वडवणीहून बीडकडे येणाऱ्या अॅपे रिक्षाला बीडहून वडवणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला गेला. रिक्षाचा अपघातात अक्षरशः चुराडा झाला. रिक्षात १० ते १२ जण होते. अपघाताची माहिती मिळताच आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पाठवून रुग्णाना स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. बीड शहरातील पठाण कुटुंबावर काळाने घाला घातला. मदिना अफजल पठाण (३०), तबस्सुम अकबर पठाण (४०), रेहान अफजल पठाण (१०), तमन्ना अकबर पठाण (८), सारा सत्तार पठाण (४०) यांचा मृतांंमध्ये समावेश आहे. सर्वांचा जागीच मृत्यू झाला.