पिंपरी – शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात मोहीम उघडली. 19 ते 29 जानेवारी या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या मोहिमेला आणखी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. वाढीव मुदतीमुळे पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखांच्या पोलिसांमध्ये चुरस वाढली. ही वाढीव मुदत देखील संपली असून होणाऱ्या अंतिम मूल्यांकनात कोण प्रथम आणि कोण शेवट येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परराज्यातून पिस्टल आणून त्याची शहरात विक्री केली जाते. तीच शस्त्रे वापरून अनेक गंभीर गुन्हे केल्याच्या घटना पोलीस दफ्तरी दाखल आहेत. मागील 15 वर्षात ज्या गुन्हेगारांनी अवैध अग्निशस्त्र (पिस्टल) वापरून गुन्हे केले आहेत, त्यांची माहिती काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिस्टल, काडतुसे, कोयते, तलवारी, पालघन अशी घातक शस्त्रे मोठ्या प्रमाणात जप्त केली. 29 जानेवारी रोजी पुन्हा या स्पर्धेला पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली.
कोण पोहचले शस्त्रांच्या उगमापर्यंत
या मोहिमेमध्ये ज्या गुन्हेगारांकडे शस्त्रे सापडतील त्यांच्याकडे कसून चौकशी करत ती शस्त्रे कुठून, कशी, कोणाला देण्यासाठी, कशासाठी आणली याबाबत माहिती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. शस्त्रे ज्या भागातून आणली आहेत, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यामुळे या 15 दिवसांत कोणते पथक शस्त्राच्या उगमापर्यंत पोहचले, हे पाहणे देखील
औत्सुक्याचे आहे.
एकाच दिवशी सात पिस्टल, दहा काडतुसे जप्त
गुरुवारी (दि. 2) आळंदी, महाळुंगे, वाकड, हिंजवडी, सांगवी या पाच पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे दाखल करत 13 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात पिस्टल, 10 काडतुसे, चार कोयते आणि एक तलवार अशी भलीमोठी शस्त्रे जप्त केली आहेत. आळंदी आणि वाकड मध्ये गुंडा विरोधी पथकाने, वाकडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक तर सांगवीमध्ये दरोडा विरोधी पथकाने कारवाया केल्या आहेत.
कोणाला बक्षीस, कोणावर कारवाई
अवैध शस्त्र जप्त करण्याच्या मोहिमेत प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या पोलीस स्टेशन व शाखा यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस दिले जाणार आहे. तर सुमार व कमी दर्जाची कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस स्टेशन व शाखांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा व पथकांमध्ये शस्त्रे जप्त करण्यासाठी चढाओढ लागली आहे. या स्पर्धेत कोणत्या पोलीस स्टेशन अथवा गुन्हे शाखेला पहिले बक्षीस मिळणार तर कुणावर सुमार कामगिरीबाबत कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.