कराड – कराड दक्षिणेतील गावांना वरदान ठरलेली उंडाळे प्रादेशिक पाणी योजना पुनर्जीवित करण्याच्या माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. मी केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेस पहिल्या टप्प्यात 4 कोटी 86 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जखिणवाडी, नांदापूर, कोयना,वसाहत यासह काही गावात ही योजना दुरुस्ती करून नव्याने कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
टंचाई आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कराड दक्षिणमधील टंचाईग्रस्त गावांना वरदान ठरली होती. योग्य देखभाल दुरुस्ती अभावी ही दुर्लक्षित होऊन कालांतराने बंद पडली. इतकी मोठी योजना त्याकाळी 35 ते 40 कोटी खर्चून उभी केली होती. आजच्या घडीला अशी योजना नव्याने उभी करताना किमान 80 ते 90 कोटी रुपये निधीही कमी पडेल. त्यामुळे या योजनेचा वापर करणे गरजेचे आहे.
हे ओळखून तत्कालीन मलकापूर नगरपंचायतीने ही योजना व्यापारी तत्त्वावर चालवण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारने योजना स्वतः चालवणार असल्याचे सांगून मलकापूर नगरपंचायतीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र, राज्यातील काही प्रादेशिक योजनांचे पुनर्जीवन करताना उंडाळे योजना वगळण्यात आली. म्हणून सप्टेंबर 2018 मध्ये या योजनेचे पुनर्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. थोड्याच दिवसात याचा अध्यादेश निघेल. या योजनेत सहभागी होणे ज्या-त्या गावाच्या गरजेनुसार ऐच्छिक असेल यात सहभागी होणे सक्तीचे नसेल.