शिरूर -शिरूर शहरात बाहेरुन आलेल्या नागरिकांपैकी सातजण संस्थात्मक क्वारंटाइन, तर 492 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. सर्वांना शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील व शिरुर नगर परिषद यांच्या वतीने क्वारंटाइन केले आहे.
पुणे, मुंबई, दिल्ली, नाशिक, संगमनेर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, सातारा या भागातून नागरिक आलेले आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यामुळे कामगार वर्ग जास्त प्रमाणात येत आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांना करण्यासाठी दहा वॉर्डमध्ये दहा टीमची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच 17 कमान येथे 24 तास तपासणी पथक कार्यरत आहे. नगरपरिषद, पोलीस स्टेशन यांचे हे पथक असून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहे.
शहरात उघडी असणारे दुकाने व शासनाने नेमून दिलेले सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांची टीम तयार केली आहे.
नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या अध्यक्षतेखाली व संबंधित प्रभागातील नगरसेवक मुख्याधिकारी व वॉर्ड अधिकारी यांची प्रभागनिहाय समिती तयार करण्यात आलेली आहे. हे या सर्व ठेवलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे काम करणार असल्याचेही रोकडे यांनी सांगितले.