पंतप्रधान श्रीमती गांधी यांची घोषणा
लखनौ, ता. 7 – किमतीवर कडक नियंत्रण घालून किंवा स्वस्त धान्य विक्रीची अधिक दुकाने उघडून वा दोन्ही प्रकारचे उपाय योजून अत्यावश्यक वस्तूंचे वाढते भाव रोखण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जाहीर केले. कुमाओन टेकड्या भागातील प्रचंड जाहीर सभेत श्रीमती इंदिरा गांधी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, “सामान्य माणूस आणि मागास भागात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणास प्राधान्य द्यावे, असे सरकारच्या मनात आहे!’ पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, “पक्षाच्या कार्यक्रमावर व धोरणावर विश्वास असणाऱ्यांनीच या पक्षात राहावे. कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याआधी ध्येय, धोरण पटते का ते मनाला विचारावे. उत्तर होकारार्थी आले तरच पक्षात यावे नाहीतर बाहेर राहावे!’
रवींद्रनाथ म्हणत, “प्रेम हा जीवनाचा खरा धर्म आहे!’
पुणे – “रवींद्रांच्या कल्पनेचा फुलोरा फार विलक्षण व नयनरम्य होता. त्यांच्या लेखणीत साकार होणारा शब्द न शब्द त्यांच्या प्रतिभासंपन्नतेची साक्ष देतो. माणसाने माणसावर विसंबूनच उत्कर्ष साधला पाहिजे. प्रेम हा जीवनाचा खरा धर्म आहे, असे रवींद्रांचे तत्त्वज्ञान होते’, असे उद्गार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी “गुरूदेव रवींद्रनाथ टागोर’ हे वसंत व्याख्यानमालेतील सतरावे पुष्प गुंफताना काढले.
पुढे ते म्हणाले, रवींद्रनाथांच्या चिंतनाला अनुभवाची बैठक होती. मुलांचे शिक्षण निसर्गाच्या सान्निध्यात व्हावे, त्यांना आवश्यक ते स्वातंत्र्य असावे, तसेच शिक्षक हे चारित्र्य संपन्न असलेच पाहिजेत या विचारांचा पुरस्कार रवींद्रनाथ करीत. याच कल्पनेतून “शांतिनिकेतन’ या संस्थेचा उगम झाला. भारताला या थोर माणसाची किंमत त्यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर कळली, हे खरे दुर्दैव होय.