सातारा -मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे लॉकडाऊनच्या महिन्यांमधील अचूक वीजवापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत वीजग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम वेगाने दूर होत असल्यामुळे महिनाभरात मंगळवारपर्यंत (दि. 7 जुलै) सातारा जिल्ह्यात दोन लाख 66 हजार वीजग्राहकांनी 47 कोटी 68 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला, असा दावा महावितरणने केला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून मीटर रिडींग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. काही ग्राहकांकडे दि. 23 मार्चनंतर मीटर रिडींग होऊ शकले नाही. त्यांना मार्चसह एप्रिल व मे महिन्याचे बिल सरासरीने देण्यात आले. त्यानंतर दि. 1 जूनपासून मीटर रिडींग सुरु करण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या या दोन- तीन महिन्यांमध्ये वीजग्राहकांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापराचे अचूक मीटर रिडींग उपलब्ध झाले व त्याचे समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. मात्र जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडींगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्स ऍप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम युद्धपातळीवर सुरु केले. यासोबतच वीजक्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील वीजबिलांची आकारणी नियमानुसार व योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे वीजग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वेगाने सुरु झाला आहे.
गेल्या महिन्याभरात कराड विभागात 80 हजार 300 ग्राहकांनी 13 कोटी 55 लाख, फलटण विभागात 38 हजार 300 ग्राहकांनी 7 कोटी 3 लाख, सातारा विभागात 91 हजार 200 ग्राहकांनी 18 कोटी 44 लाख, वडूज विभागात 30 हजार 850 ग्राहकांनी 4 कोटी 25 लाख आणि वाई विभागात 25 हजार 300 ग्राहकांनी 4 कोटी 41 लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला.