त्यामुळे वाढतोय सामाजिक असंतोष!
आयएलओच्या अहवालातील निष्कर्ष
जिनिव्हा – जगभरातील 470 दशलक्ष लोकांना एक तर नोकऱ्या नाहीत किंवा त्यांच्या नोकऱ्या त्यांच्या मनासारख्या नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे जगभरात एकूणच सामाजिक असंतोष वाढताना दिसत आहे असा निष्कर्ष संयुक्तराष्ट्रांच्या एका अहवालात मांडण्यात आला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे जो अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र जगभरारातील बेरोजगारीचे प्रमाण बहुतांशी स्थिर असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. जगातील बेरोजगारीचे प्रमाण स्थीर असताना भारतातील बेरोजगारीचे प्रमाण मात्र अलिकडच्या काळात लक्षणीय वाढले आहे.
गेल्या वर्षी बेरोजगारीचे प्रमाण 5.4 टक्के इतके होते त्यात यावर्षी फार वाढ होईल अशी शक्यता नाही असे यात म्हटले आहे.तथापी सध्याच्या मंदिच्या वातावरणात या प्रमाणात किचींत वाढ होण्याचा अंदाज आहे. सन 2019 मध्ये 188 दशलक्ष लोक बेरोजगार होते यंदा हे प्रमाण 190.5 वर जाण्याची शक्यता आहे. सध्या 285 दशलक्ष लोकांना नोकऱ्या असल्या तरी त्यांच्या अपेक्षे इतक्या त्या चांगल्या नोकऱ्या नाहींत.
आपल्या योग्यतेपेक्षा कमी पगारावर किंवा खालच्या श्रेणीत काम करावे लागत असल्याने त्यांच्यात मोठी नाराजीची स्थिती आहे. चांगल्या नोकऱ्या मिळत नसल्याने त्यांनी नोकऱ्या शोधण्याचे काम सोडून आता मिळेल तो रोजगार करण्यावर त्यांनी समाधान मानले आहे. जगभरात एकूण जो वर्क फोर्स आहे त्याच्या तेरा टक्के हे प्रमाण आहे. लोकांसाठी चांगली रोजगार संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर आता अधिक भर द्यावा लागेल असे मत या कामगार संघटनेचे प्रमुख गाय रायडर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चांगला रोजगार नसणे हे सध्याच्या एकूणच सामाजिक असंतोषाचे प्रमुख कारण आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सन 2009 ते 2019 या काळात सोशल अनरेस्ट इंडेक्स मध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.