ता. 11, माहे जून, सन 1975
मुंबई – यंदा महाराष्ट्रात 80 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन झाले, असे मुख्यमंत्री नाईक यांनी म्हटले आहे. यंदा पीकपाणी चांगले होईल अशी मला आशा होती व ती खरी ठरली आहे. आपले धान्य उत्पादन उद्दिष्ट साध्य झाल्याने राज्याच्या इतिहासात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
सध्या वाईट गोष्टींकडेच लक्ष
नवी दिल्ली – देशापुढे सध्या सर्वात कठीण अशी आव्हाने असून काही व्यक्ती प्रगतीला मदत करण्याऐवजी केवळ वाईट गोष्टींकडेच लक्ष देत आहेत, याचा खेद वाटतो, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधींनी तीन हजार एनसीसी कॅडेटस्समोर बोलताना काढले.
वजन घटवण्याचे दुष्परिणामही
नवी दिल्ली – वजन कमी करण्यासाठी जे प्रौढ लोक आहारावर नियंत्रण घालतात, त्यांच्या शरीरातील लोहतत्त्व कमी होण्याचा धोका असतो, असे आढळून आले. जर्मन प्रा. जॉर्ज स्लॉटर यांनी म्हटले आहे की, अशा नियंत्रित आहारात जरी वैविध्य आणले, तरीही लोहाचे प्रमाण अपुरेच राहते. त्यांच्या मते अशा 20 ते 40 टक्के लोकांत लोहाची कमतरता आढळते.
स्वस्त दरात तेल नाही
तेलअवीव- भारताला सवलतीच्या दरात किंवा उधारीने आम्ही तेल पुरवू शकणार नाही. कारण ते आमचे धोरण नाही. पण तरीही भारताची तेलाची गरज पुरविण्यात अडथळा येणार नाही. तेलाच्या किमतीत वाढ केली जाणार नाही, असे सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले.