काश्मीरमध्ये 1953 पूर्व स्थिती हळूहळू पुन्हा निर्माण होत आहे
श्रीनगर, दि. 29 – जम्मू-काश्मीरमध्ये 1953 पूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने योग्य ती घटनात्मक पावले उचलली जात आहेत, असे आज राज्याचे महसूलमंत्री मिर्झा अफझल बेग यांनी सांगितले. “आफताब’ या स्थानिक उर्दू दैनिकास मुलाखत देताना त्यांनी हे घोषित करून सांगितले की तशी (1953 पूर्वीची) स्थिती हळूहळू निर्माण होत आहे. इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरचे कायमचे नागरिक बनता येऊ नये, यासाठी संबंधित कायदे अधिक कडक केले जात आहेत. 1953 नंतरची या संबंधीची, राज्य सरकारने दिलेली प्रमाणपत्रे पुन्हा तपासली जाणार आहेत व बनावट असतील ती रद्द करण्यात येणार आहेत, असे बेग म्हणाले.
38व्या घटनादुरुस्ती बिलास 15 राज्यांनी मंजुरी दिली
नवी दिल्ली – आज आणखी 4 राज्यांनी 38व्या घटनादुरुस्ती बिलास मंजुरी दिल्यामुळे एकूण 15 राज्यांनी या बिलास मंजुरी दिली आहे. विधान परिषदेपैकी उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांच्या विधान परिषदांनी बिलास मंजुरी दिली आहे. घटनेतील तरतुदीप्रमाणे 12 राज्यांनी साध्या बहुमताने घटना दुरुस्तीस मंजुरी दिली म्हणजे राष्ट्रपती घटनादुरुस्ती बिलास आपली संमती देऊ शकतात. त्यामुळे ही तरतूद आता पूर्ण झाली आहे.
100 वर्षे वयाची कासवांची जोडी
कलकत्ता – अलीपूर प्राणिसंग्रहालयातील एक कासवांची जोडी 100 वर्षांची जुनी आहे. सबंध देशातच नव्हे तर जगात हीच जोडी अत्यंत जुनी आहे. या कासवांच्या पाठीचा घेर एक मीटर आहे.