अलिप्तता वादाचे भारताचे धोरणच यशस्वी ठरले
बेलग्रेड, दि. 18 – “तौजुग’ या युगोस्लाव वृत्तसंस्थेला भारताचे परराष्ट्र मंत्री चव्हाण यांनी मुलाखत दिली. चव्हाण म्हणतात, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सध्या जो समझोता दिसत आहे त्यामुळे अलिप्तता वादाचे भारताचे धोरण किती मोलाचे आहे हे सिद्ध होत आहे. मागील काळात शीतयुद्ध सुरू होते
परंतु आता पूर्व व पश्चिम या भागातील राष्ट्रांत आज समझोता झाल्यामुळे कित्येक जटिल प्रश्न सुटले आहेत. ताठर भूमिका सैल झाल्या आहेत. जागतिक शांतता व सुरक्षितता, सहकार्य, सर्व राष्ट्रांत सार्वभौमत्व, ऐक्य व स्वातंत्र्य ही भूमिका समान असली पाहिजे यावर भारताचा भर आहे.
काश्मीर कराराची रूपरेषा तयार
काश्मीर – केंद्र सरकार व शेख अब्दुल्ला यांच्या दरम्यान काश्मीर प्रश्नावर चालू असलेला चर्चेचा अंतिम क्षण जवळ आला असून केंद्रीय राजकीय विचार समितीने या प्रश्नावर होणाऱ्या कराराची रूपरेषाही तयार केली आहे.
सामाजिक ऋणाची जाणीव असणारे विद्यार्थी व्हावेत
पुणे – बदलत्या परिस्थितीनुसार निष्ठावान आणि सामाजिक ऋणाची जाणीव असणारे विद्यार्थी निर्माण होण्याची आज गरज आहे, म्हणून शिक्षण संस्थांनी ही जाणीव ठेवून उद्याचे नेतृत्व करणारी भावी पिढी निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आज सकाळी पुणे विद्यापीठात केले.
संकटावर मात करणे हाच खरा पुरुषार्थ आहे असे सांगून ते म्हणाले, देशाचा स्वाभिमान व सार्वभौमत्व संपन्न ठेवण्यासाठी मानवी शक्ती व बुद्धी यांची योग्य सांगड घालून कामाला लागण्याची इतिहासाची मागणी आहे आणि ती जबाबदारी विद्यार्थी व शिक्षण संस्थांची आहे.
उत्पादनाच्या ठिकाणीच तपासणी व्हावी
पुणे – सरकारच्या भेसळ प्रतिबंधक कायद्यामुळे अगदी लहान व्यापारीसुद्धा बळी पडतात व त्यांना कैद वा दंडाची शिक्षा होते. सरकारने जेथे मालाचे उत्पादन होते तेथेच तपासणी केल्यास व्यापाऱ्यांनाही निर्भेळ माल मिळेल.