फराक्कासंबंधी भारताची चर्चेची विनंती फेटाळली
नवी दिल्ली, दि. 20 – फराक्का प्रकल्पासंबंधी पाणीवाटपाबाबत पूर्वअटीखेरीजच्या चर्चेसाठी भारताने केलेली विनंती बांगला देशाने संबंध नसलेली अशी कारणे दाखवून फेटाळून लावली आहे, असे दिसते.
याआधी बांगलादेशाने अशी एक अट घातली होती की, भारत मार्चच्या मध्यापासून जुलैच्या मध्यापर्यंतच्या काळात पाणी घेणे बंद करण्यास तयार असला पाहिजे. परंतु आता अशी आणखी एक नवी अट बांगला देशाने घातली आहे की, गंगेचे पाणी वर्षभर मिळाले पाहिजे. तथापि, परराष्ट्र मंत्रालयाचा एक प्रवक्ता म्हणाला की, बांगला देश भारताच्या विनंतीला प्रतिसाद देईल, अशी आम्हाला आशा वाटते.
आर्यभट्टाचा 1500वा जन्मदिन युनेस्कोतर्फे साजरा होईल
नवी दिल्ली – प्राचीन भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट यांचा 1500वा जन्मदिन “युनेस्को’तर्फे साजरा करण्यात येणार आहे, असे आज नियोजन राज्यमंत्री गुजराल यांनी सांगितले. आर्यभट्ट यांच्या सर्व लिखाणाचे भाषांतर करण्यास घेणार आहे.
आर्यभट्ट यांचा जन्म पाटणा येथे 13 एप्रिल 476 मध्ये झाला होता. आर्यभट्ट 15व्या जन्मशताब्दीनिमित्त परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यात भाग घेण्यासाठी जपान, पाश्चिमात्य राष्ट्रे व पूर्व आशियातील गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात येणार आहे. जन्मदिनाचे कार्यक्रमाचेवेळी आर्यभट्ट यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.