पंतप्रधानांच्या लोकशाही श्रद्धेला योग्य प्रतिसाद द्या
मुंबई, दि. 25 – पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकसभेसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊन लोकशाही पद्धतीवर आपली अढळ श्रद्धा व्यक्त केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त दिलेल्या संदेशात निवडणुका घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रचार आणि अफवा यावर विश्वास न ठेवता आपण शिस्तीने पंतप्रधानांच्या ह्या श्रद्धेला योग्य प्रतिसाद दिला पाहिले. वीस कलमी आणि पाच कलमी कार्यक्रमांद्वारे सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचे सर्वंकष प्रयत्न झाले.
जनता पक्षाचा जाहीरनामा
नवी दिल्ली – सत्तेचे विकेंद्रीकरण, गांधीवादी तत्त्वावर आधारित शोषणमुक्त व समानता असलेला समाज स्थापन करणे, या तत्त्वांचा समावेश जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
निवडणुकांमध्ये शांतता राखा
नवी दिल्ली – लोकशाही पद्धतीने आपल्या देशात भक्कम मूळ धरलं आहे. आपली लोकशाही आपल्या प्रगतीच्या आणखी एका महत्त्वपूर्ण कालखंडाच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. लोकसभेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. निवडणूक प्रचारात कटुता व द्वेषभावनेला थारा न देता देशातील शांतता कायम राखा, असे आवाहन राष्ट्रपती अहमद यांनी केले.