नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने देशात अन्न प्रक्रिया उद्योग वाढावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना अधिक भाव मिळण्यास मदत होते, असा यामागे सरकारचा दृष्टीकोन आहे. 2020 च्या अखेरपर्यंत देशभरामध्ये 46 अन्नप्रक्रिया उद्योग कार्यरत झाले. यामध्ये खासगी क्षेत्रातून 171 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
यातील तीन प्रकल्प मोठे आहेत. 15 कॉल्ड चैन आहेत. तर 21 छोटे प्रकल्प आहेत. त्याचबरोबर 7 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत झाल्या असल्याचे अन्न प्रक्रिया मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यामुळे 24 हजार 567 लोकांना रोजगार मिळाला आहे. या अन्नप्रक्रिया उद्योगातून 31.52 लाख टन कृषी उत्पादनावर प्रक्रिया केले जाते. 15 कोल्ड चैनमुळे 56.99 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करणे शक्य झाले आहे.
134 अन्न प्रक्रिया उद्योगांना परवानगी दिली आहे. हे उद्योग आगामी काळात लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक पातळीवर जी कृषी उत्पादने उपलब्ध होतात त्यावर प्रतिक्रिया प्रक्रिया केल्यानंतर या उत्पादनांचे निर्यात होण्यास मदत होते. कृषी उत्पादनाची नासाडी टळते. शेतकऱ्यांना अधिक भाव मिळण्यास मदत होते.