वाघळवाडी – शारीरिक स्वास्थ्य,पर्यावरण विषयक जागृतता आणि सायकल चालवण्याचे फायदे नागरिकांना पटवून देण्यासाठी बारामतीतील तरुणांनी 450 किलोमीटरचा दोन दिवसांत प्रवास करून नागरिकांना सायकल चालवण्यासाठी उद्युक्त केले.
बारामती तालुक्यातील सायकल क्लबचे सभासद आणि बारामतीचे पहिले आयर्नमॅन सतीश ननावरे यांना दुसऱ्यांदा आयरमॅन किताब पटकविण्यासाठी त्यांना सुभेच्छा संदेश देण्यासाठी व निसर्गासाठी सायकल किती उपयुक्त साधन आहे, हे पटवून देण्यासाठी सात तरुणांनी आगळा वेगळा उपक्रम राबवीत बारामती-कोल्हापूर-बारामती असा 460 किलोमीटरचा सायकल प्रवास दोन दिवसांत पूर्ण केला. हे सातही तरुण रविवारी (दि. 21) पहाटे 5 वाजता बारामतीवरून फलटण-सातारा-कराडमार्गे 225 किमीचा प्रवास केला व पहिल्या दिवसाच्या रात्रीचा मुक्काम ज्योतिबाच्या डोंगरावर केला. सोमवारी (दि. 22) सकाळी काकड आरती करून कोल्हापूरकडे रवाना होत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कराड-सातारा-फलटण मार्गे 240 किलोमीटरचा प्रवास करीत बारामतीत पोहोचले.
या सायकल प्रवासादरम्यान शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरणविषयक जागृतता आणि सायकल चालवण्याचे फायदे नागरिकांना पटवून देण्याचे कामही केले. या सायकल प्रवासात प्रमोद फरांदे, तानाजी वायसे, अमर राऊत, सुरेश बोर्डे, अक्षय कुदळे, सागर नाळे आणि ज्ञानेश्वर काकडे यांनी सहभाग घेतला. हा सायकल प्रवास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या रॅलीसाठी बारामती सायकल क्लबचे ऍड. श्रीनिवास वायकर आणि नीलेश घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.