कराड – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कराड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेस आज प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रचंड पोलीस बंदोबस्तात तब्बल 445 अतिक्रमणे हटविण्यात आली. ही मोहीम पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
पालिका व पोलिसांच्या भूमिकेचे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वागत केले. मात्र, या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची पळता भुई थोडी झाली. शहरातील इतर भागात आणखी चार दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत काढण्यात आलेली अतिक्रमणे भविष्यात पुन्हा होऊ नयेत, यासाठी पालिकेने कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. कराड शहरात स्थानिकांसह अनेक परप्रांतीयांनी आपले व्यवसाय रस्त्यांवर मांडले असून पालिकेला त्यांच्याकडून
थोडा महसूल मिळत असल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचा या आधी नेहमी दिखावा करण्यात आला होता. मात्र, दिवसेंदिवस या व्यावसायिकांची संख्या वाढत गेल्याने शहराला बकाल स्वरूप येऊ लागले. कोणीही यावे आणि रस्त्यावर व्यवसाय मांडावा, अशी स्थिती होती.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली होती. त्यातून वादविवाद व अपघात होत असल्याने काही नागरिकांनी त्याविरोधात उठाव करण्याचा प्रयत्न केला. या आधी माजी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या काळात बसस्थानक व भाजी मंडई परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र, कालांतराने पुन्हा तिथे व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली. लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळे त्यांचे फावत होते. हातगाडेवाल्यांनी पालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शहरात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पालिकेस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याबाबत निवेदन दिले होते. या मोहिमेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सकाळी साडेआठपासून सायंकाळी सातपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. विजय दिवस चौक, बसस्थानक, दादासाहेब उंडाळकर पुतळा, भेदा चौक, बाजार समिती गेट नं. 1, कार्वे नाका परिसर, कोल्हापूर नाका परिसरातील अतिक्रमणे दिवसभरात हटविण्यात आली.
अनधिकृत फलक, खोकी हटविली
विजय दिवस चौक ते कोल्हापूर नाका परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये खोकी, अनाधिकृत फलक व अतिक्रमित केलेल्या जागेचा समावेश आहे.
तगडा बंदोबस्त
पालिकेने 250 अधिकारी व कर्मचारी, पोलीस दलातील 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यासाठी पाच ट्रॅक्टर व तीन जेसीबींचा वापर करण्यात आला.