ढाका : आसामसाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर मागील दोन महिन्यांत भारतातून 445 बांगलादेशी नागरिक त्यांच्या देशात परतले. त्याविषयीची माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) प्रमुख मोहम्मद शफिनुल इस्लाम यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि एनआरसीवरून वातावरण तापले आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, एनआरसी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याची भूमिका बांगलादेशने घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच इस्लाम यांच्या नेतृत्वाखालील बीजीबीचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्या शिष्टमंडळाची भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) शिष्टमंडळाबरोबर चर्चा झाली. मात्र, त्या चर्चेत एनआरसीचा मुद्दा उपस्थित झाला नाही.
,