निमगाव वाघा, उक्कडगावची वसुली शंभर टक्के ः पिंपरी घुमटमध्ये फक्त 28 टक्के वसुली
नगर – नगर तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेली बुऱ्हाणनगर व इतर 44 गावांसाठी असलेली प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना अनेक मोठ्या ग्रामपंचायतींच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची थकबाकी 6 कोटी 57 लाख 38 हजार 104 रुपयांवर गेली आहे. ग्रामपंचायतींकडून मोठी थकबाकी असल्याने एकूण थकबाकीच्या 25 टक्के रक्कम प्रत्येक ग्रामपंचायतीने 30 जानेवारीपर्यंत न भरल्यास त्या गावांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा नगर तालुक्याच्या परिविक्षाधीन गटविकास अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेला आहे.
नगर तालुक्यातील निमगाव, व उक्कडगाव या ग्रामपंचायतींची शंभर टक्के वसुली झालेली आहे. मेहेराबाद 93 टक्के, दरेवाडी 84 टक्के, तर वाकोडीची 80 टक्के वसुली झालेली आहे. बुऱ्हाणनगर, पिंपळगाव उज्जैनी, टाकळी काझी, वारूळवाडी, वाळुंज, पोखर्डी या गावांची 70 ते 80 टक्क्यांपर्यंत वसुली झालेली आहे. साकत, शेंडी, पिंपळगाव वाघा, दहिगाव, निमगाव घाणा, हमीदपूर यांची वसुली 60 ते 70 टक्क्यांदरम्यान आहे.
रुईछत्तीसी, निंबोडी, जेऊर, पिंपळगाव माळवी, खातगाव टाकळी यांची वसुली 50 ते 60 टक्क्यांदरम्यान आहे. वडारवाडी, डोंगरगण, टाकळी खातगाव, हिंगणगाव, वाटेफळ, सारोळा बद्धी, पारगाव मौला, नागरदेवळे, जखणगाव, बाराबाभळी यांची वसुली 40 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान आहे. शहापूर, शिराढोण, कापूरवाडीची वसुली 30 ते 40 टक्क्यांदरम्यान आहे. मांजरसुंबा व पिंपरी घुमट यांची वसुली फक्त 20 ते 28 टक्क्यांपर्यंत आहे.
सर्वांत जास्त थकबाकी नागरदेवळे ग्रामपंचायतीकडे आहे. हा आकडा दोन कोटी 10 लाख एक हजार 872 इतका आहे, तर वसुली एक कोटी 47 लाख 64 हजार 808 अशी म्हणजे, 41.28 टक्के आहे. या योजनेत सर्वांत कमी वसुली पिंपरी घुमट या ग्रामपंचायतीची झालेली असून, वसुली चार लाख 28 हजार 949 असून, थकबाकी 11 लाख आठ हजार असून, वसुलीची टक्केवारी फक्त 27.91 टक्के आहे. सन 2019-20 मध्ये डोंगरगण, सारोळा बद्धी, कापूरवाडी, बुऱ्हाणनगर, पिंपळगाव उज्जैनी, वाळुंज, पिंपळगाव वाघा या आठ ग्रामपंचायतींनी एक रुपया ही भरलेला नव्हता.
या योजनेतील सर्वात जास्त थकित गावे
नागरदेवळे 2 कोटी 10 लाख, वडारवाडी 38 लाख 25 हजार, केकती 48 लाख, कापूरवाडी 32 लाख 27 हजार, बुऱ्हाणनगर 47 लाख 41 हजार, जेऊर 20 लाख 99 हजार, शिराढोण 14 लाख, बाराबाभळी 22 लाख 98 हजार, जखणगाव 11 लाख 44 हजार, हिंगणगाव 16 लाख 33 हजार, टाकळी खातगाव 18 लाख 43 हजार, खारे कर्जुने 24 लाख 85 हजार, खातगाव टाकळी 19 लाख 91 हजार, पिंपळगाव माळवी 19 लाख 89 हजार, शेंडी 14 लाख 54 हजार.
तर करणार पाणीपुरवठा बंद
नगर तालुका पंचायत समितीच्या परिविक्षाधीन गटविकास अधिकारी अशिमा मित्तल यांनी बुऱ्हाणनगर पाणी योजनेतील सर्व ग्रामपंचायतींना ताकीद दिल्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांत जवळपास 60 लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली असून, आणखी दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ थकबाकी भरण्यासाठी दिली आहे. तसे न झाल्यास संबंधित गावांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.