नवी दिल्ली, दि.15- देशाचा सैनिक हा आपल्या सर्वांसाठी आपल्या आत्मसन्मानाचा, आत्मियतेचा विषय आहे. एखादा सैनिक सिमेवर देशाचे रक्षण करताना शहिद झाल्यानंतर त्याच्या बलिदानाबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत असते. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत देशभरातील तब्बल 436 सैनिकांनी आत्महत्या करत आपला जीव दिला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने, गेल्या तीन वर्षांत केंद्रीय दलाच्या 436 हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्याचे संसदेत सांगितले आहे. दरम्यान हे थांबवण्यासाठी विविध पातळ्यांवर पावले उचलली जात असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सीएपीएफ, आसाम रायफल्स आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 3 वर्षांत 436 जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 135, 2021 मध्ये 157 आणि 2020 मध्ये 144 जवानांनी टोकाचे पाऊल उचलत धक्कादायकरित्या आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
नित्यानंद राय पुढे म्हणाले की, सीएपीएफ, आसाम रायफल्स आणि एनएसजी जवानांच्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत, कर्मचाऱ्यांची बदली आणि रजा यासंबंधी पारदर्शक धोरणे बनवून, एखाद्या कर्मचाऱ्याने अवघड क्षेत्रात सेवा दिल्यानंतर, शक्य तितक्या पातळीवर जवानांना त्यांच्या आवडीप्रमाणे तैनाती देण्यावर विचार केला जातो. यासोबतच जवानांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि सैनिक यांच्यात नियमित संवाद साधला जात आहे. कामाच्या तासांवर नियंत्रण ठेवून पुरेशी विश्रांती दिली जात असल्याचेही राय यांनी सांगितले. तसेच, काही अवघड भागात पोस्टिंग करताना, पूर्वीच्या पोस्टिंगच्या ठिकाणी सरकारी निवासस्थान (कुटुंब ठेवण्यासाठी) तसेच उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या वैयक्तिक आणि मानसिक समस्यांचे निवारण करण्यासाठी तज्ज्ञांशी संवाद आयोजित करणे इत्यादींचा उपयोजनांचाही यात समावेश आहे
दहा लाखांच्यावर सैनिक संख्या
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा निमलष्करी दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल(सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा बल (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक यांचा समावेश होतो. या दलांची एकत्रित संख्या सुमारे 10 लाख आहे. दुसरीकडे, गृह मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले की, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या(यूएपीए) चौथ्या शेड्यूल आणि पहिल्या शेड्यूल अंतर्गत सरकारने फेब्रुवारी 2023 पर्यंत 54 दहशतवादी आणि 44 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे.
गेल्या तीन वर्षांतील आत्महत्या
2022- 135
2021- 157
2020- 144