बिलासपूर – ग्रामपंचायतीच्या छोट्याशा खोलीमध्ये बंद करून ठेवलेल्या तब्बल 43 गायींचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातल्या मेडपार गावात ही घटना घडल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
तख्तपूर विकास गटामधील मेडपार गावात ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतील एका लहान खोलीमध्ये एकूण 60 गायींना बंद करून ठेवले गेले होते. आज या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यावर त्यापैकी काही गायी-वासरे मरण पावली असल्याचे लक्षात आले, असे बिलासपूरचे जिल्हाधिकारी सारांश मिट्टर यांनी सांगितले.
या गायींना या खोलीमध्ये कधीपासून आणि का बंद करून ठेवण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येणार आहे. मरण पावलेल्या 43 गायींचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचे उत्तरीय तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित 17 गायींची प्रकृती स्थिर आहे. पशू क्रूरता विरोधी कायदा आणि गुरांचे हाल, हत्या करण्याविरोधी भारतीय दंडसंहितेतील कलम 429 खाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.