पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या (बालभारती) वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून इयत्ता पहिली ते बारावीच्या पुस्तकांची छपाई करण्यात येते. गेल्या तीन वर्षांत अभ्यासक्रम बदलल्याने व खराब झालेली तब्बल 426 टन जुनी पुस्तके धूळखात पडली आहेत. ती सर्व रद्दीत काढण्यात येणार असून, यासाठी ई-निविदा मागविण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
गेल्या सव्वा वर्षात करोनामुळे शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे यंदा पुस्तक छपाईच्या कामास विलंब झाला. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी प्रतीक्षाच करावी लागली. त्यातच आता पुस्तके रद्दीला काढल्याने उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.
राज्यातील पुणे, गोरेगाव, लातूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, पनवेल या गोदामांत सर्व जुन्या पुस्तकांचे ढीग लागले आहेत. त्यामुळे पुस्तके रद्दीला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जून्या अभ्यासक्रम, खराब, छपाई करताना चुका झालेली, शुद्धलेखनाच्या चुका झालेल्या पुस्तकांचा समावेश यात प्रामुख्याने आहे.
पुस्तकांच्या छपाईसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. रद्दीत मात्र ही पुस्तके कवडीमोल भावानेच विकावी लागतात. दरवर्षी मागणीचा अंदाज घेऊनच पुस्तके छपाई करायला पाहिजे. मात्र, पुस्तके जास्त छपाई केल्यामुळे ती वापराविना धूळखात पडतात. पुस्तके रद्दीत देण्यासाठी निविदा सादर करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 6 सप्टेंबरला निविदा उघडण्यात येणार आहेत.
मागील काही वर्षांमध्ये काही इयत्तांचे अभ्यासक्रम बदलले आहेत. त्यामुळे ती पुस्तके वितरीत केलेली नाहीत. काही पुस्तके वापरण्यासारखी राहिलेली नाहीत. दर तीन वर्षांनी जुनी पुस्तके कागदी लगद्याच्या निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून दिली जातात. यंदाही तीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके रद्दीला देण्यात येणार नाहीत.
– दिनकर पाटील, संचालक, बालभारती