सलग दुसऱ्या वर्षी राज्यात पावसाचा हाहाकार
तिरुअनंतपुरम : केरळला पावसाने झोडपून काढले असून पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्यांची संख्या 42 झाली आहे. आतापर्यंत 22 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. एक वर्षांपूर्वीच केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. त्या वेळी शतकातील सर्वात मोठा पूर आला होता. आताही पुन्हा पावसाचा जोर चालू असून सरकारने लष्कर, नौदल व हवाई दल यांची मदत मागितली आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वायनाड, मल्लापुरम, कन्नूर, इडुक्की येथे सर्वात मोठा फटका बसला असून कोची विमानतळावरील सेवा विस्कळीत झाली आहे. रविवापर्यंत विमानसेवा रद्द करण्यात आली असून गेल्या ऑगस्टमध्ये विमानसेवा पंधरा दिवस पुरामुळेच बंद ठेवावी लागली होती. पैकी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून शैक्षणिक संस्था, व्यावसायिकमहाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.