नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यात रोज हजारोंच्या संख्येने करोनाचे रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान, नोकियाने मागील आठवड्यात तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे असलेल्या आपल्या प्रकल्पातील काम तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे दिसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नोकियाने आपल्या कंपनीतील किती कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे हे स्पष्ट केले नाही. तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी कंपनीने आपल्या प्रकल्पामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझेशनही सुरू केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच या सर्व बाबींची खबरदारी घेऊन मर्यादित कामगारांच्या मदतीने उत्पादनाला सुरूवात केली होती.
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत उद्योग सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली होती. काही दिवसांपूर्वी मोबाईलचे उत्पादन करणारी कंपनी ओप्पोनेदेखील दिल्लीच्या बाहेरील परिसरात असलेला आपला प्रकल्प तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानेच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते.