आ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी 41 कोटी 26 लाख रुपयांचा निधी द्या, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मागील आठवड्यात आ. काळे यांनी न्यायालय परिसराची पाहणी केली. त्यावेळी वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालयाच्या इमारती मोडकळीस आल्या असून, काही दिवसांपूर्वी या इमारतीचा काही भाग कोसळला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेऊन आ. काळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी देण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, माजी आ. अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करून जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यात यश मिळविले आहे. मात्र इतर दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या इमारतीचे बांधकामही तातडीने करणे गरजेचे आहे.
इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदान प्रक्रियेला व विधिज्ञांना आनंत अडचणी येत आहे. या इमारतींचे बांधकामासाठी तहसीलदारांनी जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे 41 कोटी 26 लाख 43 हजार रुपयांचे अंदाजपत्रक पाठविले आहे. उच्च न्यायालयाच्या इन्फास्ट्रक्चर कम बिल्डिंग कमिटीने कोपरगाव न्यायालयाच्या जुन्या इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत बांधणे बाबतचा जिल्हा व सत्र न्यायालय यांचा प्रस्ताव मान्य केलेला आहे.
त्यामुळे नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांची दोन न्यायालय व दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांची तीन न्यायालये अशी एकूण पाच न्यायालये स्थलांतरित करावी लागणार आहे. त्यासाठी रक्कम रुपये 66 लाख 65 हजार एवढ्या अंदाजपत्रकीय खर्चात उच्च न्यायालयाच्या बिल्डिंग कमिटीने मान्यता दिलेली आहे. मात्र आजपर्यंत निधी न मिळाल्यामुळे हे काम सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे इमारत बांधकामास प्रशसकीय मान्यता देऊन निधीची उपलब्धता करावी, असे आ. काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.