नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष सीमेवर 300 ते चारशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. घुसखोरीचा प्रयत्न झाल्यास सीमेवर शत्रूला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले.
उत्तर सीमेवर निर्माण झालेली कोंडी राजनैतिक मार्गाने आणि चर्चेद्वारा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, भारताच्या संयमाची परीक्षा पाहण्याची चूक कोणी करू नये, अशा स्पष्ट शब्दात लष्कर प्रमुखांनी चीनला इशारा दिला.
लष्करदिन संचलनात जनरल नरवणे मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, सीमेत कोणी एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न केला तर चोख प्रत्यूत्तर देण्यात येईल आणि पुर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही. आमची चर्चेतून राजनैतिक पातळीवर मार्ग काढण्यास आम्ही बांधिल आहोत.
मात्र आमच्या संयमाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मी देशाला आश्वासित करतो, देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा यांना कोणतीही हानी भारतीय लष्कर पोहोचवू देणार नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही देशांना समान सुरक्षा आणि परस्परांना मान्य होईल, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुरावा
दहशतवाद्यांना सुरक्षित नंदनवन देण्याचे शेजारी राष्ट्राचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या कराराच्या 40 टक्के वाढ झाली आहे, हा पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुरावा आहे. ड्रोनचा वापर करून शस्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली
संचलनात समावेश
जनरल करिअप्पा मैदानावर झालेल्या संचलनात प्रथमच ड्रोनचा समावेश करण्यात आला. विमानरोधक क्षेपणास्त्र सचिल्का, ब्रम्होस यांचाही समावेश यात करण्यात आला. त्याचबरोबर लढाऊ वाहन बीएमपी 2, टी 72 रणगाडे, अनेक क्षेपणास्त्रे एका वेळी सोडू शकणारी पिनाका या यंत्रणेचाही संचलनात समावेश होता.