वन विभागाच्या प्रयत्नांना यश : 400 हेक्टरपैकी 158 वर केली वृक्ष लागवड
पुणे – वन विभागातर्फे वन जमिनींवरील अतिक्रमण हटविण्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 400 हेक्टर वन जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे. यापैकी सुमारे 158 हेक्टर वन जमिनीवर वृक्षलागवड केली असून यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले आहे.
पुणे वन विभागाकडून वन विभागाच्या अखत्यारितील जमिनींवर वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, वन जमिनींची योग्य मोजमाप नसल्याचे आणि त्यामुळे वन जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने वन जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम वनविभागाकडून राबविली गेली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 400 हेक्टर वन जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे 300 कोटी इतकी आहे.
यामध्ये इंदापूरमधील 270 हेक्टर, बारामती येथील 72.09 आणि दौंड येथील 36.71 हेक्टर वन जमिनींचा समावेश आहे. अतिक्रमणमुक्त केलेल्या वन जमिनींचे विभागाकडून सींमाकित केल्या असून त्याठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर येथील 108 हेक्टर, बारामती येथील 36 हेक्टर आणि दौंडमधील 14 हेक्टर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले आले. याठिकाणी विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. नुकतीच वनविभागतर्फे यासंदर्भात एक चित्रफित प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये वनजमिनी अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे.
वनविभागाच्या अखत्यारितील बहुतांश जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचे समजल्यानंतर विभागाकडून व्यापक स्तरावर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी विविध तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. गावागावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करण्यात आली तसेच त्यांना याबाबत समजावून सांगण्यात आले. वनविभागाची मोठी टीम या कामात सहभागी झाली होती. यापुढेही ही मोहीम अशाचप्रकारे सुरू राहणार आहे
ए. श्री लक्ष्मी, उपवनसंरक्षक