गणेश आंग्रे
पुणे: लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या कामात गैरहजर राहणे, निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 400 जणांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यात पुणे मतदारसंघातील 300 आणि बारामतीमधील 100 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात मतदारांची संख्याही मोठी आहे. मतदार नाव नोंदणी मोहिमेत सुमारे एक लाख नव मतदारांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात 900 ने मतदान केंद्रांची संख्या वाढून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 906 इतकी झाली आहे. यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढल्याने मनुष्यबळाची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाला सुमारे 40 हजार मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तसेच ऐनवळी आवश्यकता भासल्यास कर्मचारी कमी पडू नये, म्हणून जादा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार जिल्हा प्रशासनाने 40 हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची ऑर्डर काढली आहे.
निवडणुकीची ऑर्डर हाती मिळताच कर्मचारी निवडणुक ड्युटी रद्द करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. ज्या व्यक्तींची खरच अडचण होती. त्यांची निवडणुक ड्युटी रद्द करण्यात आली. मात्र काही बहाद्दूरांनी खोटी कारणे, न पडणाऱ्या सबबी सांगत बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच, निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच हा प्रकार सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून प्रशासनाने या कामचुकवेगिरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिले तसेच निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
विभागीय चौकशीही होणार
जिल्हा प्रशासनाकडून एवढयावरच न थांबता या कामचुकार 400 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे पत्रही संबधित कर्मचाऱ्यांच्या विभाग प्रमुखांना दिले आहे. यामुळे निवडणुकीचे काम टाळण्याच्या प्रकाराला आळा बसण्यास मदत होईल.