फैसलाबाद – पाकिस्तानातील 40 टक्के जनता कुपोषित आहे, अशी स्पष्ट कबूलीच पाकिस्तानातील अन्न सुरक्षा आणि संशोधन खात्याचे फेडरल मंत्री सईद फखर इमाम यांनी दिली आहे. फैसलाबादेतीत कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सातव्या “सायकोपॅथोलॉजिकल कॉन्फरन्स’च्या उद्घाटनाच्या सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
शेतीवर होणाऱ्या विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी इमाम यांनी केले. किडींच्या प्रदुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. वातावरण बदलाच्या समस्येमुळे शेतपिकांवरील विविध आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेही शेतीचे उत्पादन घटले असल्याचेही इमाम यांनी यावेळी सांगितले.
शेतीचे उत्पादन घटण्यावर पंतप्रधान कृषी आपत्कालिन कार्यक्रमाच्या माध्यमातून तातडीने काही उपाय योजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. चीन हा जगभरातील सर्वात मोठी अर्थसत्ता बनतो आहे. चीनने एवढी प्रगती कशी केली याचा आपण अभ्यास केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
जगातील सातव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानने लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्याचे उत्पादनही वाढवले पाहिजे, यावर इमाम यांनी विशेष जोर दिला.