पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनल्याने मागील आठ दिवसापासून बंद असलेला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत झाला आहे. यामुळे स्वारगेट आगारातून मंगळवारी दिवसभरात 40 बस फेऱ्या सोडण्यात आल्या. यामुळे पुण्यात अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. परंतु, कर्नाळा नाका अद्यापही पाण्याखाली असल्याने सांगलीला जाणाऱ्या बसेस बुधवारपासून सुरू होणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग सुरू केल्यानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मागील आठ दिवसापासून कोल्हापूर व सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांनी मंगळवारी स्वारगेट बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कोल्हापूरला जाणाऱ्या बसेसच्या आरक्षण तिकीट खिडकीवरही रांगा लागल्याचे बसस्थानकांवर दिसून आले.
राष्ट्रीय महामार्ग सुरू केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी सुमारे 40 बस फेऱ्या सोडल्या आहेत. सांगलीच्या कर्नाळा चौकात अद्यापही पाणी असल्याने बससेवा मंगळवारपर्यंत बंद होती.
– प्रदीपकुमार कांबळे, आगारप्रमुख, स्वारगेट