मुंबई – राज्यावर करोनाचे संकट असतानाच राजकारणही चांगलंच तापले आहे. महाविकास आघाडीवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका केली जात आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अशातच भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसून सरकार अगदी व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे सरकार अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. आम्ही जनतेच्या भल्याचे निर्णय घेत आहोत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार म्हणजे टिकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याऐवजी विरोधी पक्षच अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची यादी तयार असल्याचा दावा बच्चू कडूंनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे आपल्याला दाखवले जात आहे. मात्र, खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधील हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.