हिंगोली – जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईतून सेनगाव तीन मंडळ वगळल्याने गोरेगाव येथील शेतकरी संपावर गेले आहेत. गोरेगाव अप्पर तहसीलसमोर त्यांचे आंदोलन सुरू आहे. आज (दि.17) येथील आंदोलन अधिकच तीव्र झाले. रस्त्यावर टायर जाळून प्रशासनाचा निषेध केला. सेनगाव तालुक्यातील गोरगाव, बाभूलगाव, आजेगाव, पूसेगाव ही महसुल मंडळे अतिवृष्टीतून वगळली गेली आहेत त्यामुळे गोरेगाव परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी संप पुकारला.
हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक मंडळात ढगफूटी देखिल झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील दौऱ्यावर आले असता सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असे आश्वासन देखिल दिले होते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव- बाभूळगाव- पुसेगाव व आजेगाव हें सर्कल अतिवृष्टीतून वगळ्यात आले असल्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये एवढा निधी अतिवृष्टी धारकांमध्ये वितरित होणार असे म्हटलं. मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव,आजेगाव,बाभूळगाव आणि पुसेगाव ही चारगावं मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे तेथील शेतकरी निराश झालेत.
गोरेगाव येथील शेतकरीच्या मागण्या –
१) सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा लाभ देण्यात यावा.
२) नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे.
३) जिल्हा तसेच महाराष्ट्रभर सरसकट पिक विमा लागू करण्यात यावा.
४) कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी.
५) तत्काळ वीज बिल माफ करण्यात यावी.
हिंगोली जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांरी आमदार, खासदार यांच्यावर या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी चांगलीच टिका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट अनुदान मिळेल, मग हिंगोली जिल्ह्यातील चार मंडळे अतिवृष्टीतून का वगळन्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्याचे हे राजकारण गोरेगाव येथून चालते पण हें मंडळ देखिल वगळण्यात आले आहे.