हवेलीत महसूल विभागाकडून पंचनामे पूर्ण : तेराशे शेतकऱ्यांना आर्थिक झळ
सोरतापवाडी- हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उसासह मका, कांदा, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. बाजरीसारखी काढणी केलेली पिके मातीमोल झाली आहेत. यामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे 4 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती हवेली तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांनी दिली.
यावर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत 3 हजार 100 हेक्टरी 600 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने ऑक्टोंबरमध्ये 4 हजार 700 हेक्टर नुकसान झाले आहे. यात 1 हजार 300 शेतकऱ्यांना झळ बसली आहे. हवेली तालुक्यात परतीचा पावसाने यंदा शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला पिके पेरणीच्यावेळी पावसाने उशीर केल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. परतीच्या पावसाने काढणीला आलेली पिके पावसात भिजली आहेत. खरीपातील काढणीस आलेली पिके व रब्बीतील पेरणी झालेली पिके व फळबाग, पालेभाज्या, फुले व ऊस यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा विचार करून भरपाई लवकर द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
- हवेली तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम होत आले आहे. सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे फोटो व माहिती अधिकाऱ्यांना द्यावी.
– सपना ठाकूर, तालुका कृषी अधिकारी, हवेली. - सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते फिरकायचेही बंद झाले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई लवकर मिळेल का नाही, अशा द्विधामनस्थितीत शेतकरी अडकला आहे.
– भाऊसाहेब चौधरी, प्रगतशील शेतकरी, सोरतापवाडी.