जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती कायम ठेवत भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे 4 जवान जखमी झाले. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत गोळीबार केला. त्या माऱ्याचे लक्ष्य जम्मू-काश्मीरचे अखनूर क्षेत्र ठरले.
त्यामध्ये जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याच्या इराद्याने पाकिस्तानी सैनिकांनी तो मारा केल्याचे समजते. पाकिस्तानी कुरापतीला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचा भंग केला जातो. त्या आगळिकींना जबर प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होते. त्यानंतरही तो देश सुधारत नसल्याचे शस्त्रसंधी भंगाच्या घटनांवरून दिसून येते.