मनिला – फिलिपाइन्सच्या चक्रीवादळात 39 जण ठार झाले असून या चक्रीवादळामुळे आणि तुफानी पावसामुळे देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुराच्या आपत्तीतून नागरीकांच्या बचावासाठी अनेक ठिकाणी लष्कराची मदत घ्यावी लागली आहे.
लष्कराने हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे. या तडाख्यात अनेक ठिकाणी पडझड झाली असून वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्याचा अंदाज घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
या आपत्तीत 30 ते 40 जण बेपत्ता झाले असून लष्कराच्या तुकड्या त्यांचा शोध घेण्याचे काम करीत आहेत. बुधवारी रात्री आलेले हे वादळ गुरूवारी सकाळपर्यंत अनेक भागात धुमाकूळ घालत होते. याची आधीच कल्पना आल्याने सुमारे साडे तीन लाख लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी टळली आहे.
प्रत्यक्ष आपत्तीत सापडलेल्या एक लाख लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले असून फिलिपाइन्सच्या राजधानीच्या शहरातील 41 हजार जणांनाही या आपत्तीतून बाहेर काढण्यात आले आहे. या आपत्तीमुळे देशाच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तो पुर्ववत करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.