नवी दिल्ली – जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षादरम्यान चीनचे 38 सैनिक ठार झाले. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा ही संख्या खूपच जास्त आहे. ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्राने एका अहवालाच्या आधारे हा दावा केला आहे.
चीनचे किमान 38 सैनिक एकतर वाहून गेले किंवा बुडाले असे काक्सोन या वर्तमानपत्राने सोशल मीडियावरील संशोधनाच्या आधारे म्हटले आहे. चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या वेबो या सोशल मीडिया ऍपवरील चॅटचाही संदर्भही या अहवालामध्ये देण्यात आला आहे.
चीनकडून खोटी आकडेवारी जाहीर केली जाणे काही नवीन नाही. गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनने आपले केवळ 4 सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. काक्सोन वर्तमानपत्राने त्रयस्थपणे सोशल मीडियाचा अभ्यास करून काढलेल्या निष्कर्शामध्ये चीनचा हा अधिकृत दावा सपशेल खोटा असल्याचे म्हटले आहे. चीनचे एकूण 35 सैनिक या संघर्षात ठार झाल्याचे काही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही म्हटले होते. मात्र पीपल्स लिबरेशन आर्मीने या संघर्षात केवळ 5 सैनिक ठार झाल्याचे म्हटले होते.
काक्सोनच्या अहवालाने भारतीय माध्यमांच्या दाव्यालाही पुष्टी मिळाली आहे. गलवान खोऱ्यातील नदी रात्रीच्यावेळी ओलांडण्याच्या प्रयत्नात चीनचे अनेक सैनिक बुडाले किंवा वाहून गेले असावेत असे भारतीय माध्यमानी म्हटले होते. यावेळी भारतीय सैनिकांच्या प्रतिकारामुळे चीनी सैनिकांना आपले पावसाळी कपडे घालण्याइतकाही वेळ मिळाला नाही. अंधारातच बर्फाच्या पाण्यातून नदी ओलांडण्याचा निर्णय चिनी सैनिकांना घ्यावा लागला होता. त्यामुळेच ही मोठी जीवितहानी झाल्याचे काक्सोन वर्तमानपत्राने म्हटले आहे.