पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती अद्यापही ओसरली नाही. यामुळे गेल्या 6 दिवसांपासून राज्यभरातील विविध बसस्थानकांतून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जाणाऱ्या सुमारे 37 हजार 500 एसटी बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अनेक राज्य महामार्ग पाण्याखाली गेल्याने पूर्णत: वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबईहून एस.टी. वाहतूक सेवा सुरू असते. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील एकूण 74 मार्गावरून सांगली व कोल्हापूरला वाहतूक सुरू असते. तसेच, कोल्हापूरला जाणाऱ्या 29 हजार 517 तर सांगलीला जाणाऱ्या 8 हजार 60 फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे, एस.टी. प्रशासनाने सांगितले आहे.